Wednesday, May 20, 2015

मराठी भाषेशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न

evivek | July 28, 2014 |
*****रमेश पानसे ******
प्रियदर्शनी शाळा केवळ इंग्रजीचा अट्टहास करून विद्यार्थ्यांना एकभाषिक – तेही परभाषिक करू पाहत आहे. परंतु इतकेच नाही, ही शाळा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा ही प्रथम महत्त्वाची आणि मराठी भाषा ही दुय्यम दर्जाची असाच धडा देऊ पाहत आहे. मराठी भाषेविषयी प्रेमच वाटू नये, मराठी भाषेची, त्याकरवी मराठी संस्कृतीची नाळ तोडण्याचा हा प्रयत्न आहे. बऱ्याचदा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असे भाषिक व सांस्कृतिक खच्चीकरण करू पाहत आहेत आणि प्रियदर्शिनी शाळेचा अधिकारी जितेंद्र सिंग हा नेमका हाच प्रयत्न करू पाहत आहे, असे त्याच्या भयभीत करणाऱ्या अन्याय्य कृतीवरून दिसून येत आहे. जर महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा मराठीचा आकस सांभाळणार आणि वाढवणार असतील, तर तो शासनाने आणि राजकीय पक्षांनी दखल घ्यावी असा प्रश्न आहे.
कुठेतरी कानाकोपऱ्यात एखादी घटना घडते. वृत्तपत्रात त्याची बातमी बनते आणि एक-दोन दिवसात ती विरूनही जाते. समाजात फारसा कोणी तिचा विचार केला नाही, तर ती समाजाच्या विस्मृतीत जाऊन नाहीशी होते. नुकत्याच वाचलेल्या एका बातमीबाबत असे होऊ नये, त्या बातमीचे खोलवरचे गांभीर्य समाजाच्या लक्षात यावे, त्यावर अधिक चर्चा घडाव्यात यासाठी हा लेखाचा प्रपंच.
घडलेली घटना अशी आहे
पुण्याजवळील भोसरी येथे ‘प्रियदर्शनी’ नावाची इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे. तिथे मराठी मुले जातात. आजचा संभ्रमित पालकवर्ग ज्या एका अशैक्षणिक मानसकितेत अडकून आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून अडकवून ‘कृतकृत्य’ होतो, त्याच प्रकारे भोसरीच्या या ‘प्रियदर्शनी’ नामक शाळेत मराठी पालकांनी आपल्या मुलांना घातले आहे. अर्थातच, मुलांची पहिली आत्मसात केलेली भाषा मराठी असल्यामुळे, ती मुले परस्परांमध्ये नैसर्गिकरित्याच मराठीतून बोलणार. परंतु हे भाषेच्या नैसर्गिकतेचे शास्त्र या शाळेच्या व्यवस्थापनाला एक तर कळत नाही, किंवा कळत असले तरी ते त्यांना मान्य नाही. त्यामुळे असे घडले की, अनेक मुले (आपल्या नैसर्गिकतेने) परस्परांशी फावल्या वेळात मराठीत बोलत होती, हे सहन न होऊन या शाळेच्या जितेंद्र सिंग नावाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने 28 मुलांना बेदम चोपून काढले. इयत्ता आठवीतील ही सारी मुले होती. म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याच्या संरक्षणाखालील ही मुले होती.
या घटनेचे विविध पदर. या घटनेचे एक एक पदर उलगडून पाहू या.
पहिली गोष्ट अशी की, मार खालेल्या मुलांनी स्वत:च या घडलेल्या घटनेचे आणि त्यामागील घटना मालिकेचे वर्णन केले आहे. ते असे आहे -
या शाळेची शिस्त काही न्यारीच आहे. येथे प्रत्येक वर्गात एक ‘भाषाप्रमुख’ नेमलेला असतो. कोणताही विद्यार्थी इंग्रजीशिवाय अन्य भाषेत, म्हणजे मराठीत वगैरे बोलला, तर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये त्याच्या नावापुढे तो फुली करतो. तक्रार करणाऱ्या मुलाचे रास्त म्हणणे असे की, आम्हाला इंग्रजीतील नेमके शब्द बऱ्याचदा येत नाहीत आणि मग आम्ही तेथे कधीकधी मराठी शब्द वापरतो. या विद्यार्थ्यांच्या नावापुढे अशा तेवीस फुल्या जमल्या होत्या. वापरलेल्या प्रत्येक मराठी शब्दासाठी छडी मारण्याचा जितेंद्र सिंग महोदयांनी सपाटा चालवला. पण तेवीस छडया मारूनही त्यांचा कंडू शांत झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने तेवीस छडया झाल्याचे सांगूनही ते त्याला मारतच राहिले. दुसऱ्याही विद्यार्थ्याची अशीच कथा. अशा प्रकारे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना बदडून काढणारी केवढी मोठी शक्ती या जितेंद्र सिंगाकडे आहे.
केवळ शक्तीच नव्हे, तर विलक्षण कू्ररपणा या माणसाकडे आहे. कारण ”आपण किती छडया मारतोय हे न मोजताच सिंग सटासट छडया मारतच राहिले; इतके, की ती छडीच मोडली. मग त्यांनी काय करावे? मुलांना चक्क लाथा-बुक्क्यांनी हाणायला सुरुवात केली. विद्यार्थी माराने कोलमडून पडला तरी त्याचे मारणे थांबले नाही” अशी मुलांची तक्रार आहे. ‘हाती लागेल त्या वस्तूने ते हाणतात’ अशीही मुलांची तक्रार आहे.
या घटनांचा आशय
काय आहे या साऱ्या घटनांचा आशय?
एक म्हणजे, या शाळेच्या ‘मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या’ला साधे कायदे माहीत नाहीत. मुलांना शारीरिक शिक्षा करण्यास पूर्णत: बंदी आहे, हे याला माहीत नसावे हे आश्चर्य आहे. आणि जर माहीत असेल, तर त्याने हे बेकायदेशीर कृत्य जाणूनबुजून केले आहे, असे म्हणता येईल. म्हणजे मुलांनी मराठी बोलण्याचा गुन्हा केल्याबद्दल शिक्षा करायची आणि याने मात्र कायदा मोडण्याचा गुन्हा करायचा!
दुसरे म्हणजे, एवढया मोठया प्रमाणावर हे शिक्षा प्रकरण घडले म्हणून याची शाळेबाहेर वाच्यता झाली. एरवी या शाळेत हे असे कायमच घडत असणार. सवयीप्रमाणे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इंग्रजी शाळाचालकांना घाबरून मूग गिळून स्वस्थ बसत असणार. म्हणजे येथे एक अधिकारी व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण शाळासंस्थाच गुन्हेगार आहे आणि या गुन्हेगारीला (इंग्रजीच्या गुलामीपोटी) खपवून घेणारे पालकही दोषी आहेत.
तिसरी गोष्ट अशी की, अलीकडे विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून हे शिस्तीचे मोठे अवडंबर माजवले जात आहे. शिस्त म्हणून निरर्थक आणि शिक्षण व्यवहारात अडथळा ठरणारे बूट-मोजे-टाय घालायला लावायचे. शिस्तीने (गुन्हेगारांसारखे) मुलांना हात मागे बांधून चालायला लावायचे, शिस्तीने ओळींत घट्ट बसवून ठेवायचे, शिस्तीने ”गुडमॉर्निंग सऽऽर” असे बळजबरीने म्हणायला लावायचे, असे एक ना अनेक प्रकार आढळून येतात. शाळेचे असे सैनिकीकरण करून मुलांना सहजसुंदरतेने शिकता येत नाही, हे या इंग्रजी शाळांना कोण पटवणार? पुन्हा असे की, शालेय शिक्षणात प्रत्येक संस्था स्वत:च्या मर्जीने शिस्तीचे नियम ठरवणार आणि त्याखाली विद्यार्थ्यांना पिळून काढणार! अशाच प्रकारचा सैनिकी शिस्तीचा प्रकार या शाळेतही दिसून येतो. तसे नसते, तर वर्गांवर्गांमध्ये मराठी बोलू न देण्याची शिस्तबध्द योजना आखली गेली नसती. शिस्त आणि शिक्षा या सख्ख्या बहिणी आहेत. शिस्त हवी म्हणजे शिक्षा आलीच. या दोन्ही गोष्टी विद्यार्थीविरोधी आणि त्याचबरोबर आधुनिक शिक्षणतत्त्वांच्याही विरोधी आहेत.
शिस्त व त्याला जोडून आलेली शिक्षा या दोन्ही बाबी आधुनिक शिक्षणतत्त्वांच्या विरोधी आहेत असे जे मी म्हटले आहे, ते आपण सर्वांनीच (यात संस्थाचालक, शिक्षक आणि मुख्य म्हणजे पालकवर्ग यांनी) समजावून घ्यायला हवा.
आधुनिक शिक्षणशास्त्र असे म्हणते की, वर्गशिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी भयमुक्त असले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सारे शैक्षणिक वातावरण ताणरहित असायला हवे. शिक्षण असे नसले तर काय होते?
मानवी उत्क्रांतीच्या काळात माणसाच्या मेंदूचे तीन थर विकसित झाले. त्यांची कार्ये वेगवेगळी आहेत. सर्वात खालच्या मेंदूला आपण ‘जगण्या’चा मेंदू म्हणू या. श्वासोच्छ्वास, तहान, भूक वगैरे क्रिया हा मेंदू नियंत्रित करीत असतो. त्याच्या वरचा मेंदू हा ‘भावनिक मेंदू’ म्हणून ओळखला जातो. प्रेम, राग, लोभ अशा वेगवेगळया भावनांचा तो अधिपती आहे. त्यावरचा मेंदू हा प्रामुख्याने ‘बौध्दिक मेंदू’ आहे. विचार, भाषा, कल्पना, नियोजन, विविध विषयांचे आकलन अशा, मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या सर्व बौध्दिक क्रियांचा हा स्वामी मानला जातो. कुठलेही बौध्दिक काम चांगले, एकाग्रतेने होण्यासाठी भावनिकदृष्टया स्थिर असण्याची गरज असते. भावनिक मेंदू हा अनेकदा बौध्दिक मेंदूवर कुरघोडी करण्याची शक्यता कोणत्याही प्रकारच्या ताणांमुळे, भीतीमुळे, रागामुळे असते. शिकण्याचे काम हे बौध्दिक काम असेल तर ते ताणरहित, भीतिरहित आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र्यतेच्या, मुक्ततेच्या मानसिक वातावरणात नीटपणे होऊ शकते. किंबहुना म्हणूनच शाळाशाळांतील वातावरण तसे असावे लागते. विद्यार्थी मानसिकदृष्टया प्रसन्न असेल तर आणि तरच शिक्षण प्रभावीपणे होऊ शकते. ज्या शाळांना, संस्थाचालकांना, शिक्षकांना हे कळत नाही, ते मुलांना उलटया पध्दतीने म्हणजे धाकदपटशाने, बळजबरी करून, शिस्त-शिक्षांचे अवडंबर माजवून शिकविण्याचा खटाटोप करतात आणि अंतिमत: ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानच करीत राहतात. मला असे आढळते की, बऱ्याचदा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आढयतेने, पारंपरिक गैर अशा शिक्षण विचारांनी शिस्तीचे-शिक्षांचे स्तोम माजवतात. जेवढी शिस्त गहिरी, तेवढी शाळा चांगली असे दुर्दैवाने पालकही मानतात आणि आपली मुले नीटपणे न शिकण्यासाठी अशा शाळांकडे सुपुर्द करतात.
आधुनिक शिक्षणाला आधारभूत अशा मेंदूशास्त्राचा आपण जो विचार करीत आहोत, तो केवळ शाळांमधील वातावरणाशी संबंधित नाही, तर तो शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी व पुढे जीवनाशी घनिष्टपणे जोडलेला आहे. मुलांकडून कोणतेही बौध्दिक काम व्हायचे असेल तर त्यासाठी जे काही अवलंबिले जाईल, जी शिक्षणपध्दती वापरली जाईल, संबंधित प्रौढांची जी वागणूक असेल ती शिकण्याला आणि म्हणून शिकणाऱ्या मेंदूला पोषक अशी असावी लागते. घातक असून चालत नाही.
आपण हे लक्षात ठेवून, प्रियदर्शनी शाळेत घडलेल्या घटनेचे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील हे पुन्हा एकदा जाणून घेऊ या.
1. पहिला आणि तात्कालिक परिणाम असा होईल की दिलेल्या मारामुळे केवळ तेवढाच वेळ नव्हे, तर पुढे कित्येक दिवस वर्गात त्यांचे लक्ष लागणार नाही. ज्यासाठी ही मुले शाळेत आली ते त्यांचे शिकणेच नीट होणार नाही. म्हणजे अशा जबरदस्त शिक्षेमुळे शाळेने मुलांचे शैक्षणिक नुकसान केल्याबद्दल (आणि बहुधा असे नेहमीच करीत असल्याबद्दल) शिक्षणाबाबतचे नीती-नियम-कायदे पाळत नसल्याबद्दल शाळेवरच खटला भरायला हवा आहे.
2. खुद्द विद्यार्थ्यांच्या मनावर या प्रियदर्शनी शाळेतील अघोरी शिक्षेचा फार विपरीत परिणाम होऊ शकतो. मेंदूशास्त्र असे सांगते की शिक्षांमुळे, मारामुळे मेंदूच्या बौध्दिक भागातील रक्तपुरवठा घटून तो भावनिक मेंदूकडे जातो. याला शास्त्रीय भाषेत, ‘घसरण’ असे म्हणतात. रक्तपुरवठयाची अशी घसरण होऊन मुले भावनिक स्तरावर जातात. एकीकडे बौध्दिक काम बंद पडते तर दुसरीकडे तीव्र भावनिक अवस्था येऊन मुले भीतिग्रस्त होऊन भावनेने शाळेपासून-शिकण्यापासून दूर जाऊ लागतात. हा परिणाम केवळ तत्कालीन नसतो, तर तो दूरगामीही असू शकतो. ‘शिकणे म्हणजे मार’, ‘शिकणे म्हणजे शिक्षा-भीती’ अशी भावना होणे हे आयुष्यभर ‘शिकण्या’पासून परावृत्त करणारेही असू शकते.
3. जेव्हा शाळेमध्ये भीतिग्रस्त वातावरण असते तेव्हा, आणि जेव्हा सदोदित मुलांना अपमानित केले जाते तेव्हा आणखी एक परिणाम तीव्रतेने घडू शकतो. ‘रक्ताची घसरण’ आणखी होऊन ते जगण्याच्या खालच्या मेंदूकडे जाऊन काही काळ मुलांची मने भीतीने तरी ग्रस्त होतात अथवा सूडाने तरी पेटून उठतात. टोकाची स्थिती अवतरली तर भीतीने ग्रस्त होऊन क्वचित आत्महत्येपर्यंत एखादा विद्यार्थी पोहोचतो, तर एखादा विद्यार्थी सूडाने पेटून गुन्हेगारीकडे वळतो. सामान्यत: चित्र असे दिसते की, युवकांच्या गुन्हेगारीची बिजे शालेय शिक्षणातील विपरीततेत रुजतात आणि पुढे वातावरणातील संधींनी फोफावतात. प्रियदर्शनी शाळेतील शिक्षकांनी व संस्थाचालकांनी या परिणामांचा गंभीरपणे विचार करून आपल्या शाळेतील वातावरण आमूलाग्र बदलले पाहिजे. पालकांनीसुध्दा आपली मुले या शाळेतून काढून घेतली पाहिजेत. अशा मग्रूर शाळा चालण्यापेक्षा बंद पडलेल्या चांगल्या. याने समाजहित अधिक साधेल.
भाषा शिक्षण आणि मराठी भाषा
आणखी दोन मुद्दयांचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा. एक भाषा शिक्षणाचा आणि दोन खुद्द मराठी भाषेचा.
मुले लहान वयात भाषा चांगली आत्मसात करतात. शाळेत प्रवेश करेपर्यंत त्यांनी आत्मसात केलेली पहिली भाषा (या उदाहरणात) ही त्यांची आयुष्यभरची विचारांची, दुसरे विषय शिकण्याची आणि इतर भाषा अवगत करण्याचीही नैसर्गिक भाषा असते. ती जितकी समृध्द होईल, तितकी ही इतर शिक्षणकार्येही प्रभावी रितीने होतील. त्यामुळे प्रियदर्शनी शाळेत मराठी भाषा टाळून नव्हे, तर अधिक समृध्द करून विद्यार्थ्यांचे भाषिक भले होणार आहे. नाहीतरी या शाळेत (आणि अशा सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शाळांत) मराठी मुले प्रवेश करताना आपली मराठी भाषेची आयुधेच घेऊन येणार. अशा वेळी शहाण्या शाळा त्याचा सुयोग्य वापर करून या मुलांना इंग्रजीकडे वळवू शकतात. ही शैक्षणिक प्रक्रिया नैसर्गिकतेला धरून होईल. शिवाय यात मुलांचा दुहेरी फायदा होईल. एका केवळ इंग्रजीऐवजी इंग्रजी व मराठी अशा दोन्हीही भाषा मुलांना उत्तम येतील. प्रियदर्शनी शाळा केवळ इंग्रजीचा अट्टहास करून विद्यार्थ्यांना एकभाषिक – तेही परभाषिक करू पाहत आहे. परंतु इतकेच नाही, ही शाळा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा ही प्रथम महत्त्वाची आणि मराठी भाषा ही दुय्यम दर्जाची असाच धडा देऊ पाहत आहे. मराठी भाषेविषयी प्रेमच वाटू नये, मराठी भाषेची, त्याकरवी मराठी संस्कृतीची नाळ तोडण्याचा हा प्रयत्न आहे. बऱ्याचदा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असे भाषिक व सांस्कृतिक खच्चीकरण करू पाहत आहेत.
आणि प्रियदर्शिनी शाळेचा अधिकारी जितेंद्र सिंग हा नेमका हाच प्रयत्न करू पाहत आहे, असे त्याच्या भयभीत करणाऱ्या अन्याय्य कृतीवरून दिसून येत आहे.
ही अघोरी शिक्षेची घटना वाचनात आल्यापासून जितेंद्र सिंग या अधिकाऱ्याचा मानसिक तोल ढाळण्याच्या कृतीचाही मी विचार करतो आहे. मुलांच्या सांगण्यावरून असे दिसते की, हा माणूस मुलांना वाट्टेल तसे बडवत बसला होता. त्याचा संयम पार सुटला होता. असा संयम सुटण्याचा प्रसंग कशामुळे उद्भवला? वास्तविक मुलांचे वागणे त्याच्या परिचयाचे होतेच. मुलांना मराठी बोलू न देण्यासाठी त्याने वर्गातून तशी कायमची व्यवस्थाही करून ठेवलेली होती. मग तोल गेला तो मुलांवरच्या रागामुळे, की मराठी भाषेवरील रागामुळे?
मला दुसरी शक्यता अधिक वाटते आहे. एरवी मुलांनी इंग्रजी बोलावे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मराठी बोलू नये यासाठी वर्गातील व्यवस्था उभी करून मुलांवर बळजबरीने करण्याचे कारण नव्हते.
जर महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा मराठीचा आकस सांभाळणार आणि वाढवणार असतील, तर तो शासनाने आणि राजकीय पक्षांनी दखल घ्यावी असा प्रश्न आहे. मराठी भाषकांनी चिंता करावी, चिंतन करावे असा हा प्रश्न आहे.